- खिडकीच्या गजाआडून आलेले कवडसे माझ्या पुढ्यात पसरले. त्या अंधाऱ्या आणि थंड झालेल्या जागेला अचानक लकाकी आली. ऊन सावलीचा खेळ सुरू झाला... माझ्या पायाच्या तळव्यापासून ते डोक्यात भिरभिरणाऱ्या असंख्य विचारांपर्यंत... एक उबदार जाणीव दाटून आली. प्रकाशाची चाहूल लागली. मनातलं मळभ नाहीसं झालं आणि त्याची जागा लख्ख सूर्यप्रकाशाने घेतली. मनातले विचार झरझर कागदावर उतरू लागले. जणू त्या गजांमागचे असंख्य सूर्यकिरण काही सांगू पाहत होते माझ्या लेखणीतून...
- वाऱ्यानेही असाच संवाद साधलाय कधी तरी. सूर्यप्रकाशाइतका थेट नाही; पण संवाद झालाय नक्की! वाऱ्याचं ‘वाहणं’ आणि ‘वागणं’ दोन्हीही अचानक, अनाहूत, अनपेक्षित! कधी अलगद येऊन सुखावणारं, तर कधी वादळ बनून तडाखे देणारं! त्याने रानात घातलेली शीळ कधी ऐकलीये, तर कधी समुद्राच्या लाटांसोबत त्याचं उधाणलेलं रूप पाहिलंय! वादळात कधी त्याने त्याचं विध्वंसकारी रूप दाखवलंय, तर कधी एका अलगद झुळकीतून प्राजक्ताच्या झाडाखाली पखरण केलीय... किंवा कधी एखाद्या वेदनेवर हळुवार फुंकर घातलीये...
- सुगंधाशी सोयरीक करण्याचा तर छंदच लागला होता. या सोयरिकीत सख्खे कोण, चुलत - मावस कोण, सावत्र कोण हे ठरवण्याचा छंद! सोपं होतं हे ठरवणं; कारण सुगंध लहरी नसतात वाऱ्यासारखे! ठाम असतात आपल्याच विश्वात! मोगऱ्याला चुकूनही बकुळीचा गंध येत नाही आणि कस्तुरीला मृद्गंध ठाऊक नसतो. त्यामुळे ‘ठाम’ असलेल्या या गंधांशी आपोआप नातं जुळत गेलं. सुगंधाच्या अनेक छटांनी माझ्या अनेक क्षणांशी नातं जोडलं! गंध माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होऊन गेले!!
- संध्याकाळच्या मावळत जाणाऱ्या वेळेत कधीतरी मारवा ऐकलाय. तो ऐकवत होता रिषभ आणि धैवतवरचे ठेहेराव आणि त्यातून ऐकू येत होती ती वैराग्याची भावना... सूरही किती बोलके असतात नै? कधी हे वैराग्य ऐकू आलं तर कधी... ‘कौन गली गयो श्याम’मधली विरहिणी ऐकली... ‘वैराग्य’ ते ‘विरह’, ‘आर्तता’ ते ‘आर्जव’.. सूर खूप काही सांगत होते. कधी पहाटेच्या भैरवातले स्वर स्वच्छंदपणे विहरत होते.. तर कधी मैफिलीची सांगता करणारी भैरवी हुरहूर लावून जात होती... सुरांना काय सांगायचंय हे कळण्यासाठी ‘कानसेन’ व्हावं लागत हेच खरं!
- संगीतातल्या सुरांशी जो लगाव, तोच साहित्यातल्या शब्दांशी आणि रसांशी! तुलसीदासांच्या दोह्यातली भक्ती असो, किंवा शाहिराच्या पोवाड्यातली शक्ती - दोनही रस मोहवणारे!
नाथांचं ‘दार उघड बये’ ऐकताना जाणवलेला वीररस, समर्थांच्या करुणाष्टकातील कारुण्यरस आणि माउलींच्या ‘नीळिये रजनी’तला अद्भुतरस - तोच लगाव, तीच सलगी, तेच नातं...
कवडशातून दिसलेल्या प्रकाशाशी, प्राजक्ताची पखरण करणाऱ्या वाऱ्याशी, मोगऱ्याच्या सुगंधाशी, भैरवीच्या सुरांशी, शब्दांआड दडलेल्या रसांशी आणि माउलींच्या शब्दांशी जुळलेलं नातं...
या संवेदनांशी ‘जुळलेलं’ नातं आणि -
शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचसंवेदनांच्या तरल, सूक्ष्म रूपांच्या माध्यमातून संवेदनातीत असलेल्या परब्रह्माशी असलेलं.. ‘जाणवलेलं’ नातं...
तोच तर आहे... लेखणीतून पाझरणारा, सुरांतून बरसणारा, वेदनेवर फुंकर घालणारा, मोगऱ्यातून गंधाळणारा आणि शब्दांतून सुखावणारा...
सर्वदूर, सर्वसाक्षी, सर्वव्यापक...
तत् त्वं असि ।
- डॉ. अपर्णा बेडेकर